Posts

माझं आजोळ- इंगळवाडी ( नाणारच्या आठवणी)

सुमन दत्तात्रय पानवलकर नाणार म्हणजेच इंगळवाडी माझं आजोळ. आजोळी फक्त सोवळी आजी आणि विधवा मावशी. बिचारी ताईमावशी. सातव्या वर्षी लग्न झालं आणि आठव्या वर्षी तिला वैधव्य आलं. वयात येण्यापूर्वीच वैधव्य आलं त्यामुळं सासरी जायचा योगच आला नाही. माहेरीच मुक्काम. तीन मामा आपापल्या संसारात मुंबईत रमलेले. मे महिन्यात तीनही मामा आपल्या कुटंबासह गावी इंगळवाडीला येत आणि ताईमावशी आपलं दु:खं विसरुन त्यांचा छान पाहुणचार करी. उन्हाळा आला की आम्हालाही आजीकडे जायचे वेध लागायचे. आजीलाही नातवंडांची तेवढीच ओढ. त्याकाळात आमच्या गावातून म्हणजे खारेपाटणामधुन खाऊच्या पानांचे करंडे आजीच्या गावी जात. असे पानांचे दोन व्यापारी एक खांडेकर दुसरे मणचेकर. ते दर आठवड्याला खारेपाटणला येत. आजीचा मग त्यांच्यामागे तगादा सुरु होई ‘ लेकरांना कधी घेऊन येताय ?’ त्यांची होडी असे. कधी कधी त्यांचे येणे व्हायचे ते आमच्या वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर असताना. मग हे दोघे पानवाले निघून जातील या भीतीने आम्ही पेपर अर्धाच टाकून घरी येत असू. पानवाले रात्रीच्या होडीने जायचे असले तरी आमची दिवसभर उगाचच घाई चालू असे. बालवयात तोच एकमेव बदल. सुट...